Thursday, 23 September 2010

कॉमनवेल्थ, खेळ, व्यवसाय वगैरे वगैरे

बर्‍याच दिवसांनी पुन्हा ब्लॉग लिहायला घेतलाय. आज हपिसात चर्चा करत होतो. खरं म्हणजे आम्ही हपिसात तेवढचं करतो. बोलताना विषय अर्थात कॉमनवेल्थवर आला. कॉमनवेल्थला मराठीमध्ये राष्ट्रकुल म्हणतात. वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मात्र सर्रास कॉमनवेल्थ हाच शब्द वापरतात. किती ’पत्रकारांना’ राष्ट्रकुल म्हणजे कशाबद्दल बोलतोय ते कळेल हा प्रश्नच आहे. पण तो विषय पुन्हा केव्हातरी.
मुळांत राष्ट्रकुल म्हणजे काय, भारत त्याचा सदस्य का आहे. यावर चर्चा झाली. त्यामधून भारत त्याचा सदस्य असल्यामुळे किंवा नसल्यामुळे भारताला काहिच फरक पडत नाही आणि मेंबरशिप फ़ी काही खूप नाही त्यामुळे आपण मेंबर असावं असा निर्णय तत्कालिन लोकांनी घेतला असावा, असा निष्कर्ष निघाला.
विनोदाचा भाग सोडला तरी खरंच भारताला त्याचा काय फायदा आहे हे मला तरी कळलं नाही.  विकिपिडीयावर तर राष्ट्रकुल खेळ हे राष्ट्रकुलाचे सर्वात दृश्य स्वरूपाचं कार्य आहे असा उल्लेख केला आहे. ईंग्लंडची राजा/राणी राष्ट्रकुलाचे पदसिद्ध प्रमुख असतात. त्यामुळे मला तर हा प्रकार इंग्लंडच्या वसाहतवादी आणि साम्राज्यवादी ईतिहासाचं प्रतिक आहे असं वाटतय.
आता हा विषय चर्चेला यायच कारण म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणारे राष्ट्रकुल खेळ हेच होतं. त्यालाही आयोजकांच्या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळेच प्रसि्द्धी मिळाली आहे. जर सर्व अयोजन व्यवस्थित केलं असतं तर कोणीही या आयोजनाकडे आणि त्यात होणा‌र्‍या खेळांकडे ढुंकूनही पाहिलं नसतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. या आधीचे राष्ट्रकुल खेळ कुठे झाले होते आणि त्यात भारताला किती पदके मिळाली होती हे कोणाला माहिती आहे का? मलाही ते विकी बघितल्याशिवाय सांगता यायचं नाही. मला खात्री आहे की बहुसंख्य भारतियांना हे माहिती नसेल.
आता सर्वात वादग्रस्त मुद्दा. खेळाचं आपल्या आयुष्यात नेमकं स्थान काय.  मी खेळ खेळतो, आधीही खेळायचो. मी खेळतो कारण मला मजा येते म्हणून. हौशी खेळाडू हौस म्हणूनच खेळ खेळतात. पण काहीजण व्यवसाय म्हणून खेळ खेळतात. त्यांना बहुतेक व्यावसायिक खेळाडू म्हणतात किंवा त्यांची तरी तशी अपेक्षा असावी. कारण बहुतेक खेळाडूंच्या संघटनांच्या नावांमध्ये ’व्यवसायिक’ असा शब्द असतो. उदा. Association of Tennis Professionals (ATP) किंवा आता अस्तित्वात नसलेली Professional Chess Association (PCA). खेळाचे जे कथित फायदे आहेत ते व्यावसायिक खेळाडूंना होतात तसेच हौशी खेळाडूंना होतच असतिल. उलट खेळाची खरी गरज हौशी खेळाडूंनाच आहे. कारण त्यांना त्यांचा खेळाव्यतिरिक्त व्यवसाय आहे. त्यामुळे खेळाचे जे फायदे आहेत त्याची गरज त्यांनाच आहे. व्यावसायिक खेळाडू हे ईतर सर्व व्यावसायिकांप्रमाणेच आहेत असं मानलं तर मग त्यांच्यासाठी सरकारने किंवा सरकार पुरस्कृत स्पर्धा भरवायची गरजच काय. शिक्षक, तंत्रज्ञ किंवा डॉक्टर यांच्यासाठी सरकारने कुठे आंतरराष्ट्रीय स्पर्धा नियमितपणे भरवल्याचं ऐकिवात नाही. त्या-त्या व्यावसायिकांच्या संघटनाच त्यांच्यासाठी व्याख्याने, स्पर्धा, सभा आयोजित करतात. अनेक खेळाडूंच्या संघटनासुद्धा स्पर्धा आयोजित करतात. उदा. ATP स्पर्धा. शिक्षक, डॉक्टर ईत्यादी व्यावसायिकांचा समाजाला काहितरी उपयोग आहे. व्यावसायिक खेळाडूंचा समाजाला नेमका काय उपयोग आहे की त्यांच्यासाठी सरकारने काही करावं? ऑलिंपीक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धा अशा स्पर्धांच्या आयोजनामध्ये सरकारने भाग घ्यावा का?  त्यासाठी खेळाडूंना/संघटनांना वेगळी मदत करावी का?
मला या विषयाचं पुरेसं आकलन झालेलं नाही. पण तुम्हाला काय वाटतं हे कळलं तर काही पामराच्या ज्ञानात भर पडेल.

Tuesday, 10 August 2010

लडाख अनुभव: भाग १२ - उपसंहार


या शेवटाला उपसंहार म्हणायची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मी काहीतरी रामायण किंवा महाभारतासारख महान लिहीलंय ही भावना फार छान आहे. आणि या सफ़रीनंतर आमचा आणि आमच्या प्रकल्पांचा थोड्याफ़ार प्रमाणात जो संहार झाला त्याच स्मरण म्हणून हा उपसंहार.
या सफरीनंतर hangover उतरायला बराच वेळ म्हणजे किमान दीड महिना लागला. आमच्यातील सर्वात वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या श्रीरंगाचा hangover सर्वात आधी उतरला. M Tech च्या सर्व stage वेळेवर आटोपून आता तो तैवानमध्ये एका कंपनीमध्ये नोकरी करत आहे आणि लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. मी सरांचा ओरडा खात खात कसंबसं माझं MTech वेळेवर संपवून बंगलोरमध्ये एका कंपनी मध्ये काम करतोय किंवा करत नाहीये. समीरने थोडा स्वभिमान दाखवायचा म्हणून स्वत:च stage 2 साठी मुदतवाढ मागून घेतली, जी त्याने मागितली नसती तरी त्याला मिळालीच असती. stage 3 त्याने कशीबशी वेळेवर संपवली. तो आता कोरीआ मधे नोकरी करतोय आणि त्याचही लग्न ठरलं आहे. प्रमितची stage 3 म्हणजे शेवटचे presentation आता झाले आहे आणि काही दिवसांत तो अधिकृतपणे MTech होईल. आनंद आजकाल प्रमितप्रमाणे फोन उचलत नाही आणि परत फोन करतही नाही. तो अजून MTech stage 3 करतोय असं ऐकतोय.

लडाख अनुभव: भाग ११ - जंगबाज़

मनाली
मनाली हे मग तसं इतर सर्व हिल स्टेशन प्रमाणेच आहे. एक मुख्य रस्ता ज्याला माल रोड म्हणतात तो आहे. त्याच्यावरच सगळी हॉटेल/रेस्टॉरंट आहेत. तिथे आंध्रा मेस बघून समिर आणि गुजराथी थाळी बघून प्रमित खूष झाला. मी मात्र महाराष्ट्रीय थाळी असं काही प्रकार मिळत का नाही याचा विचार करत होतो.शेवटी महाराष्ट्रीय लोकं जिथे जे मिळतं ते खातात, मराठी पदार्थच हवे असं नाटक करत नाहित असं विचार करून गप्प बसलॊ. मनालीचं प्रसिद्ध हिडींबा देवीचं देऊळ बघून आम्ही परत आलॊ. मनाली मधे पाउस पडत होता त्यामुळे white water rafting करायची ईच्छा अपूरीच राहिली.
--

मनाली ते दिल्ली
मनाली ते दिल्ली हा प्रवास आमच्या प्लॅन प्रमाणे वोल्वो बसने करणार होतो. आणि आश्चर्य म्हणजे ते त्याप्रमाणेच झालं. एका खासगी बसच तिकीट काढले होते. बस मनालीहून निघून दुसर्‍यादिवशी सकाळी दिल्ली ला पोचणार होती. आम्ही जेवून खावून दूपारी SBI विश्रामगृहातून निघून रिक्षाने मानली च्या मुख्य रस्त्यावर येवून बसमध्ये बसलो. मी आणि प्रमित शेजारी बसलो होतो, समीर आणि श्रीरंग अशी अंकल मंडळी शेजारी शेजारी बसली होती. आणि बॉस एकटाच बसला होता. नंतर बॉसच्या बाजूला कोणी फिरंगी युवती येवून बसली. नंतर बोलाचालीत समजलं की ती इस्रायेलची आहे आणि ती आधी येवून गेली आहे. एकूण तो वळणावळणाचा रस्ता आणि बस चे स्टॉप बघून वाटायला लागलं की बस काही सकाळी लवकर दिल्लीला पोचत नाही. आमच्यापेक्षा अनुभवी असणाऱ्या इस्रायेली बाईने त्याला लगेच दुजोरा दिला. बस वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबली. रस्त्याने प्रवास करताना चहासाठी थांबणे हे अधिकृत कारण असलं तरी खरं कारण बहुतेक वेळा नैसर्गिक विधी हेच असतं. पण या ठिकाणची त्यासाठीची जी जागा होती किंवा नव्हती त्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात उरकणं केव्हाही बरं होतं. पण जेव्हा फिरंगी लोकांना त्यातही स्त्रियांना त्याचा वापर करावा लागणं ही गोष्ट मला तरी फार लाजिरवाणी वाटली. भारतीय स्त्री-पुरुषांची कमी-अधिक प्रमाणात या सगळ्या प्रकाराची मानसिकता तयार झालेली असते. पण Incredible India म्हणून जेव्हा पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा या Incredible India चे असं दर्शन होऊ नये, एवढीच माफक अपेक्षाही पूर्ण होत नाही.
तिथून बस निघाली आणि त्या व्हीडीओ-कोच बस मध्ये व्हीडीओ सुरु करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याशी बराच वेळ झटापट केल्यावर त्या आयताकृती टीव्हीवर एक लंबवर्तुळाकार चित्र दिसू लागलं. चित्रपटाच नाव झळकल 'जंगबाज'. शीर्षक गीत सुरु झालं - "जंगबाज आ गये आ गये जंगबाज". गोविंदा आणि राजकुमार अशी भारी स्टारकास्ट. चित्रपट सुरू होताच बॉसला एकदम आठवल हा पिक्चर त्याने पहिला आहे. लगेच त्याने आम्हाला सांगितलं की या चित्रपटाचा शेवटचा डायलॉग आहे, "अगर मेरी याद आये तो मुझे याद कर लेना". एवढा godmaxx पिक्चर न बघून कसं जमणार! मग प्रमित आणि माझ्या त्यातल्या सीन आणि संवादांवर कॉमेंट्स सुरु झाल्या. अंकल लोकाना असं भरलेल्या बस मध्ये गोंधळ घालणं तितकसं रुचणार नव्हतं. बॉस ने सुरुवातीला थोडावेळ बघून मग कानामध्ये earphone घालून काहीतरी pink floyd किंवा तत्सम काहीतरी ऐकायला सुरुवात केली. आम्ही मात्र "अगर मेरी याद आये तो मुझे याद कर लेना" पर्यंत पूर्ण बघितला.
मग रात्री कुठेतरी जेवून आम्ही झोपून गेलो, सकाळी उठून दिल्लीला पोचू या आशेने. सकाळी उठल्यावर आम्हाला समजल की आम्ही अजून पंचकुला सुद्धा गाठला नाहीये. त्यानंतर वाटेत एका ठिकाणी टायर पंक्चर झाला. त्यानंतर मग सोनपत पानिपत करत एकदाचे दिल्ली मध्ये पोचलो. कनॉट सर्कस हून मग प्रीपेड रिक्षा करून हजरत निझामुद्दीन ला पोचलो. गरीबरथ निघायला अजून २-३ तास वेळ होता मग मधल्या वेळेत जरा खाऊन-पिउन घेतलं आणि platform वर जाऊन बसलो. लडाख ट्रीप एवढी विलक्षण होती की परत जायची कोणाचीही इच्छा नव्हती. पण या ट्रीप ने आम्ही एवढे गरीब झालो होतो की आता गरीबरथातून प्रवास करण्यावाचून काही उपाय नव्हता.
--

गरीबरथ
गरीबरथ, लालूने नाव बाकी भारी शोधलं आहे. आम्ही पराग गरीब (गरीब में गरीब, पराग गरीब) असल्यामुळे, गरीबरथातही आम्ही chaircar मधे होतो. सीट मात्र आम्हाला चांगल्या मिळाल्या होत्या. समोरासमोर ३-३ अशा ६ मधल्या ५ आम्हाला मिळाल्या होत्या आणि एक कोणीतरी मुलगी होती. जेव्हा तिला समजलं की आम्ही सगळे IIT मधे शिकतो तेव्हा एकंदरीत IIT बद्दल तिचा भ्रमनिरास झाला असावा.
कोटा आलं तेव्हा बन्सल क्लासेस मुळे रेल्वेला सुद्धा किती फ़ायदा होतो ते लक्षात आलं. जवळजवळ एक तृतियांश डबा कोट्याला रिकामा झाला. मुख्यत्वे JEE ला बसणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक असा सगळा एक जत्था तिथे उतरला. मग पहाटे ३ वाजता रत्लामनंतर बडोदा आलं आणि गुज्जू प्रमि्तला एकदम भरून आलं. मग तिथे पहाटे ३ला कान्दे-पोह्यांचा कार्यक्रम झाला. म्हणजे ३ प्लेट पोहे घेतले आणि ते ५ जणांनी खाल्ले. नंतर मात्र एकदम सकाळी ७ ला बोरीवली आलं आणि आम्ही सगळे उतरलो. मी तिथून घरी आलो आणि बाकिचे सगळे IITमधे गेले. दहा दिवसांच्या लडाख सफ़रीची सांगता झाली.

लडाख अनुभव: भाग १० - त्सो मोरीरी आणि त्सो कार

आमच्या मूळच्या प्लॅनमधे, मूळ म्हणजे 7B मधे त्सो मोरीरी, त्सो कार नव्हताच. पण हॉटेलवाल्याशी बोलल्यानंतर आखलेल्या 7B-II मधे ते समाविष्ट केलं गेलं. त्यानुसार आम्ही आज लेहधून मुक्काम हलवणार होतो. त्यामुळे सगळ सामान आवरून, हिशोब पूर्ण करून निघायचं होतं. सकाळचा नाश्ता करून, आम्ही निघालो. गेल्या ४-५ दिवसात आम्हाला जरा लडाखच्या वातावरणाची, परिसरची कल्पना आली होती. बराचसा प्रवास सिंधू नदीच्या किनार्याने होत होता. वाटेतच एका ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. तस गरम पाण्याच्या झर्‍यात काही नाविन्य नव्ह्तं पण त्या थंड वातावरणात, सिंधूच्या तीरावर आणि महत्त्वाचं म्हणजे कहितरी चहा किंवा खाण्यासाठी थांबलॊ. चहा मॅगी खाऊन पुढे निघालो. मग काही वेळाने दूपारी त्सो मोरीरीला पोचलो. त्सो मोरीरी हे संरक्षित पाणथळ वन (wetland reserved forest) आहे. तलाव खार्‍या पाण्याचा आहे पण तरीही आजू-बजूला बरीच हिरवळ आहे. पॅंगॉंगपेक्षा हा तलाव लहान आहे. पण इथे ३-४ तर्‍हेचे पक्षी आणि प्राणी बघायला मिळतात. इथले प्राणीही इतरत्र बघायला मिळत नाहीत. तिथे थोडावेळ भटकून त्सो-कार कडे निघालॊ. त्सो-मोरीरी ते त्सो-कार रस्ता म्हणजे मातीची वाट आहे, मधे मधे तो रस्ता चक्क मोकळ्या मैदानातूनच जातो. म्हणजे रस्ता आणि इतर जमीन यात काहिही फ़रकच नाहिये. गाडी जाईल तो रस्ता असा प्रकार आहे. आणि अर्थातच वाटेत कोणीही भेटत नाही. मला उगाचच भिती वाटत होती की आम्ही रस्ता चुकलोय की काय. उन्हं कलत असताना ४-४:३० ला अम्ही त्सो कारला पोचलॊ. त्सो कार हे खरं म्हणजे २ तलाव आहेत. हे दोन्ही तलाव मिळून सुद्धा त्सो मोरीरीपेक्षा लहान असतिल. उशीर होत असल्यामुळे आम्ही एक्दम तलावाच्या काठापर्यंत नाही गेलो. पण लांबून दर्शन घेतलं. तिथे वाटेतच काही तंबू होते.
त्यामधे काही लोक रहत होते तिथे चहाची सोय झाली. संध्याकाळ झालीच होती. तिथून थोड्या वेळांतच आम्ही पुन्हा लेह-मनाली हमरस्त्यावर आलो.खरं म्हणजे लेह-मनाली हा रस्तासुद्धा काही हमरस्ता म्हणण्याच्या लायकीचा नहिये. पण त्यातल्या त्यात बरा इतकच. पांग किंवा सर्चू ला मुक्काम करायचा होता. पण सर्चूला पोचेपर्यंत रात्र झाली असती म्हणून मग पांग ला मुक्काम करायच नक्की झालं. पांग म्हणजे काही तिबेटी रेफ्युजींना सरकारने तंबू बाधायची परवानगी दिली आहे, ते गाव. गाव म्हणजे १०-१५ तंबू असतिल. आमच्यासारखे काही पर्यटक आणि मुख्यत्वे ट्रकचालकांसाठी एक थांबा आहे. बहुतेक पर्यटक सर्चु किंवा किलॉंग ला थांबतात. आम्ही राहिलो तो एक मोठा तंबू होता. खाली सगळीकडे गाद्याच गाद्या होत्या. प्रत्येकाला एक ब्लॅंकेट दिलं होतं. तंबूच्या मुख्य खांबाच्याभोवती वरती दीड-दोन फ़ूट असं वर्तुळाकार भोक होतं ज्यातून थंड हवा आत येत होती. त्यामुळे तंबूत वातावरण तुलनेने उबदार असलं तरी फ़ार काही फ़रक नव्ह्ता. त्यातही सगळ्यांना दूसर्‍यादिवशी सकाळी काय करायचं हा प्रश्न होता. ट्रेकिंगमुळे निसर्गाच्या सानिध्यात उरकायचा अनुभव असला तरी इथला निसर्ग वेगळा होता. त्या कडाक्याच्या थंडीत, मैलोनमैल फ़क्त सपाट जमीन दिसते तिथे कसं काय जमवायच हा प्रश्नच होता. शेवटी भल्या पहाटे उठून किलॉंग गाठू मग बघू अस ठरलं. त्याप्रमाणे ४ला उठून पांग सोडलं आणि सर्चू पार करून बारालाचा-ला मधून किलॉंग गाठलं. किलॉंग म्हणजे हिमाचल प्रदेश चा भाग आहे. लडाखमून बाहेर पडतो आणि पुन्हा निसर्ग एकदम बदलून जातो. पुन्हा सगळीकडे झाडं-झुडुपं दिसू लागतात.
हा रस्ता रोहतांग पास मधून जातो. ऑगस्टमधे रोहतांग मधे काहिही बर्फ़ नव्ह्ता तरिही पर्यटकांची बरीच गर्दी होती. आम्ही लडाखची तथाकथित साहसी मोहिम करून इथे आल्यामुळे अजूनही आमची गाडी दशांगुळे वरूनच चाललेली होती. त्यामुळे त्या य:किंचित शूद्र मानवांकडे दूर्लक्ष करून आम्ही पुढे निघालॊ. पण तरिही एका शूद्र मानवाने आमचं लक्ष वेधून घेतलं. तिथे बर्फ़ाचा एक कणही नसताना, त्या खडकाळ मैदानात नखशिखांत fluorescent नारिंगी रंगाचा रेनकोट घालून एक माणूस चालला होता. श्रीरंग एकदम म्हणाला Huston, we have a problem" आणि एकदम हास्याची लकेर उमटली.
गाडी थांबवून त्या माणसाचा फोटो काढला गेला. काहिही कारण नसताना तो अनोळखी माणूस आमच्या आल्बमधे आहे. अर्थातच याची त्याला कल्पनाही नसेल.
मग आम्ही ट्रॅफ़िक मधून वाट काढत काढत मनाली ला पोचलो. सरळ SBI विश्राम्गृहात गेलो आणि गादीवर अंग टाकलं.

लडाख अनुभव: भाग ९ - लडाखी खाद्य-जत्रा

संध्याकाळी लेह च्या मार्केटमधून चक्कर मारायला बाहेर पडलो. श्रीरंगची तब्येत बरी नसल्यामुळे तो आला नाही. तर जवळच एक धाबा वजा हॉटेल दिसलं. आम्ही आधी चहा घ्यायला म्हणून गेलो होतो. पण समजलं की ते एक स्पेशल लडाखी फ़ूड देणारं होटेल होतं. एक लडाखी बाई आणि तिची मुलगी ते चालवत होत्या. खरं म्हणजे मला जेवणामधे फ़ार प्रयोग करायला आवडत नाही. पण आता लडाख मधे आलोय तर इथलं स्पेशल खाऊन बघूया या आग्रहाला बळी पडून मी तयारी दाखवली. आणि आम्ही काही फ़ार विचार न करता चौघांनी चार वेगवेगळ्या डिश मागवल्या. ठेंगशुक, चुतागी आणि असेच काही शब्द अशी होती. त्या बाईने फ़ार कौतुकाने आम्हाला त्या डिश काय असतात, त्यात काय असतं ते समजावून सांगायचा प्रयत्न केला. आम्ही उगाचच छान छान म्हणून माना डोलवल्या. त्यानंतर अर्धा-पाउण तास काहिही झालं नाही. मागे बसलेले काही लोकं मनालीहून मोटरसायकलवरून आले होते त्यांची चर्चा ऐकण्यात गेला. आणि मग ते चार पदार्थ आले. ते पदार्थ म्हणजे ४ वाडगी होती. त्यात काहितरी सूपसदृश्य द्रव पदार्थ होता. त्यात पालक सदृश पानं तरंगत होती. पहिला घोट/घास घेतला मात्र.. एवढा बेचव पदार्थ मी आयुष्यात खाल्ला नव्हता. पदार्थ खूप गोड, खूप तिखट असू शकतो पण तो खूप बेचव होता. समिर ला वाडग्याबरोबर एका थाळीमधे दोन पाव सदृश गोष्टी दिल्या होत्या. त्या ना भाजल्या होत्या, ना तळलेल्या होत्या. सरळ मैद्याचा गोळा दिल्यासारखं काहितरी ते होतं. मात्र प्रमित आणि आनंद दोघांनाही त्यांना आलेले पदार्थ खूप आवडले होते. पण मला तरी चारही पदार्थ सारखेच बेचव लागत होते. प्रमित आणि आनंदने चवी-चवीने ते खाऊन संपवले. मी आणि समिरने एकमेका सहाय्य करत ते संपवल्यासारखं केलं. आणि आम्ही बाहेर पडलो.