Tuesday 10 August, 2010

लडाख अनुभव: भाग ११ - जंगबाज़

मनाली
मनाली हे मग तसं इतर सर्व हिल स्टेशन प्रमाणेच आहे. एक मुख्य रस्ता ज्याला माल रोड म्हणतात तो आहे. त्याच्यावरच सगळी हॉटेल/रेस्टॉरंट आहेत. तिथे आंध्रा मेस बघून समिर आणि गुजराथी थाळी बघून प्रमित खूष झाला. मी मात्र महाराष्ट्रीय थाळी असं काही प्रकार मिळत का नाही याचा विचार करत होतो.शेवटी महाराष्ट्रीय लोकं जिथे जे मिळतं ते खातात, मराठी पदार्थच हवे असं नाटक करत नाहित असं विचार करून गप्प बसलॊ. मनालीचं प्रसिद्ध हिडींबा देवीचं देऊळ बघून आम्ही परत आलॊ. मनाली मधे पाउस पडत होता त्यामुळे white water rafting करायची ईच्छा अपूरीच राहिली.
--

मनाली ते दिल्ली
मनाली ते दिल्ली हा प्रवास आमच्या प्लॅन प्रमाणे वोल्वो बसने करणार होतो. आणि आश्चर्य म्हणजे ते त्याप्रमाणेच झालं. एका खासगी बसच तिकीट काढले होते. बस मनालीहून निघून दुसर्‍यादिवशी सकाळी दिल्ली ला पोचणार होती. आम्ही जेवून खावून दूपारी SBI विश्रामगृहातून निघून रिक्षाने मानली च्या मुख्य रस्त्यावर येवून बसमध्ये बसलो. मी आणि प्रमित शेजारी बसलो होतो, समीर आणि श्रीरंग अशी अंकल मंडळी शेजारी शेजारी बसली होती. आणि बॉस एकटाच बसला होता. नंतर बॉसच्या बाजूला कोणी फिरंगी युवती येवून बसली. नंतर बोलाचालीत समजलं की ती इस्रायेलची आहे आणि ती आधी येवून गेली आहे. एकूण तो वळणावळणाचा रस्ता आणि बस चे स्टॉप बघून वाटायला लागलं की बस काही सकाळी लवकर दिल्लीला पोचत नाही. आमच्यापेक्षा अनुभवी असणाऱ्या इस्रायेली बाईने त्याला लगेच दुजोरा दिला. बस वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबली. रस्त्याने प्रवास करताना चहासाठी थांबणे हे अधिकृत कारण असलं तरी खरं कारण बहुतेक वेळा नैसर्गिक विधी हेच असतं. पण या ठिकाणची त्यासाठीची जी जागा होती किंवा नव्हती त्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात उरकणं केव्हाही बरं होतं. पण जेव्हा फिरंगी लोकांना त्यातही स्त्रियांना त्याचा वापर करावा लागणं ही गोष्ट मला तरी फार लाजिरवाणी वाटली. भारतीय स्त्री-पुरुषांची कमी-अधिक प्रमाणात या सगळ्या प्रकाराची मानसिकता तयार झालेली असते. पण Incredible India म्हणून जेव्हा पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा या Incredible India चे असं दर्शन होऊ नये, एवढीच माफक अपेक्षाही पूर्ण होत नाही.
तिथून बस निघाली आणि त्या व्हीडीओ-कोच बस मध्ये व्हीडीओ सुरु करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याशी बराच वेळ झटापट केल्यावर त्या आयताकृती टीव्हीवर एक लंबवर्तुळाकार चित्र दिसू लागलं. चित्रपटाच नाव झळकल 'जंगबाज'. शीर्षक गीत सुरु झालं - "जंगबाज आ गये आ गये जंगबाज". गोविंदा आणि राजकुमार अशी भारी स्टारकास्ट. चित्रपट सुरू होताच बॉसला एकदम आठवल हा पिक्चर त्याने पहिला आहे. लगेच त्याने आम्हाला सांगितलं की या चित्रपटाचा शेवटचा डायलॉग आहे, "अगर मेरी याद आये तो मुझे याद कर लेना". एवढा godmaxx पिक्चर न बघून कसं जमणार! मग प्रमित आणि माझ्या त्यातल्या सीन आणि संवादांवर कॉमेंट्स सुरु झाल्या. अंकल लोकाना असं भरलेल्या बस मध्ये गोंधळ घालणं तितकसं रुचणार नव्हतं. बॉस ने सुरुवातीला थोडावेळ बघून मग कानामध्ये earphone घालून काहीतरी pink floyd किंवा तत्सम काहीतरी ऐकायला सुरुवात केली. आम्ही मात्र "अगर मेरी याद आये तो मुझे याद कर लेना" पर्यंत पूर्ण बघितला.
मग रात्री कुठेतरी जेवून आम्ही झोपून गेलो, सकाळी उठून दिल्लीला पोचू या आशेने. सकाळी उठल्यावर आम्हाला समजल की आम्ही अजून पंचकुला सुद्धा गाठला नाहीये. त्यानंतर वाटेत एका ठिकाणी टायर पंक्चर झाला. त्यानंतर मग सोनपत पानिपत करत एकदाचे दिल्ली मध्ये पोचलो. कनॉट सर्कस हून मग प्रीपेड रिक्षा करून हजरत निझामुद्दीन ला पोचलो. गरीबरथ निघायला अजून २-३ तास वेळ होता मग मधल्या वेळेत जरा खाऊन-पिउन घेतलं आणि platform वर जाऊन बसलो. लडाख ट्रीप एवढी विलक्षण होती की परत जायची कोणाचीही इच्छा नव्हती. पण या ट्रीप ने आम्ही एवढे गरीब झालो होतो की आता गरीबरथातून प्रवास करण्यावाचून काही उपाय नव्हता.
--

गरीबरथ
गरीबरथ, लालूने नाव बाकी भारी शोधलं आहे. आम्ही पराग गरीब (गरीब में गरीब, पराग गरीब) असल्यामुळे, गरीबरथातही आम्ही chaircar मधे होतो. सीट मात्र आम्हाला चांगल्या मिळाल्या होत्या. समोरासमोर ३-३ अशा ६ मधल्या ५ आम्हाला मिळाल्या होत्या आणि एक कोणीतरी मुलगी होती. जेव्हा तिला समजलं की आम्ही सगळे IIT मधे शिकतो तेव्हा एकंदरीत IIT बद्दल तिचा भ्रमनिरास झाला असावा.
कोटा आलं तेव्हा बन्सल क्लासेस मुळे रेल्वेला सुद्धा किती फ़ायदा होतो ते लक्षात आलं. जवळजवळ एक तृतियांश डबा कोट्याला रिकामा झाला. मुख्यत्वे JEE ला बसणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक असा सगळा एक जत्था तिथे उतरला. मग पहाटे ३ वाजता रत्लामनंतर बडोदा आलं आणि गुज्जू प्रमि्तला एकदम भरून आलं. मग तिथे पहाटे ३ला कान्दे-पोह्यांचा कार्यक्रम झाला. म्हणजे ३ प्लेट पोहे घेतले आणि ते ५ जणांनी खाल्ले. नंतर मात्र एकदम सकाळी ७ ला बोरीवली आलं आणि आम्ही सगळे उतरलो. मी तिथून घरी आलो आणि बाकिचे सगळे IITमधे गेले. दहा दिवसांच्या लडाख सफ़रीची सांगता झाली.

No comments:

Post a Comment