Sunday 8 August, 2010

लडाख अनुभव: भाग १ - फ़टी पडी थी

श्रीनगर, ८ ऑगस्ट, पहाटे ४ ची वेळ, नीरव शांतता, आम्ही ५ जण पहाटे अडीच वाजताच उठून, थंड-गरम पाण्याने आंघोळ करून आवरून, बॅगाभरून बसलो होतो.
ड्रायव्हर मुदस्सरनी किमान दहा वेळा सांगितल होतं ४ला तयार रहा. हालात बिगडे हुए हैं, हॉटेल के बाहर मत निकलना, सुबह अगर हम निकल सके तो ही जा पाएंगे. हालात बिगडे हुए म्हणजे काय, याचा ट्रेलर आदल्या दिवशीच बघितला होता. अमरनाथ जमीन प्रकरण ऐन भरात होतं. वातावरणांतला तणाव स्पष्ट जाणवत होता, श्रीनगरच्या प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी, चौक्यांमधे मशिनगन घेऊन २-३ जवान आणि पॅट्रोलिंग साठी आणखी ४-५ जवान एके-४७ घेऊन फ़िरत होते. हे कमी की काय म्हणून CRPF चे जवानही पेट्रोलिंग करत होते. त्यात आता मुदस्सरचा फोन लागत न्हव्ह्ता, 'Out of coverage area' असं सर्वांनी किमान २ वेळा ऐकून झालं होतं. काश्मिरमधून ' out of coverage area' म्हणजे नेमकं कुठे.. हा प्रश्न होताच त्यातच त्याला ४५०० रूपये प्रि-पेड टॅक्सी म्हणून कालच दिलेले होते आणि त्याची रिसिट सुद्धा आमच्याकडे नाही हे लक्षात आलं. अर्थात रिसीट असती तरी काही फ़रक पडणार नव्हताच. मुळच्या प्लॅनमधे नसलेला हा श्रीनगरचा मुक्काम झालाच होता. पूर्ण ट्रिप आवरून पुन्हा मुंबईला जायचं, तरी ते कसं हा प्रश्न होताच. आणि प्रत्येकी सात-आठ हजार रुपये पाण्यात जाणार होतेच.
उगाचच प्रत्येकाला २-३ मिनिटांनी गाडीचा आवाज येतो आहे असं वाटायचं, खिडकीतून बाहेर डोकावल तर डोळे फ़ुटतिल असा मिट्ट काळॊख आणि टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता असायची. नेमकं काय वाटत होतं, हे सांगायला योग्य शब्द मिळत नाहीत, आजच्या भाषेत म्हणजे "फ़टी पडी थी" असं कहिसं झालं होतं. पण तेवढ्यात कुठुन तरी एक थोडासा उजेड पडला खिडकीवर आणि बघितलं तर मुदस्सर भाई इनोव्हा मधून उतरत होते. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय ते तेव्हा समजलं.

No comments:

Post a Comment